Monday, August 22, 2005

फुलवाली

एखादी व्यक्ती आपल्याला का लक्षात राहते आणि अनेक व्यक्ती का राहत नाहीत याला कारण नाही. त्यातही लक्षात राहणाऱ्या व्यक्तीचे पहिले दर्शन मला आठवेलच असे नाही. तिच्या बाबतीतही असंच काहिसं झालं. नवे शहर, नवी नोकरी, आणि नवी भाषा यांमध्ये तेव्हा अडकून पडलेल्या मला आता ती सांगते, की वर्षानुवर्षे ती त्याच ठिकाणी गजरे विकत आलेली आहे. तोच कोपरा, तोच कट्टा आणि जवळजवळ तेच गिऱ्हाईक. तिचं पहिलं दर्शन मात्र काही केल्या मला आठवत नाही. मात्र तिला आठवतं असं ती मला सांगते.

मला आठवतो तो प्रसंग मात्र ती "पहिला" म्हणून सांगत नाही. संध्याकाळची वेळ होती. पाऊस पडून गेलेला होता. मी ऑफिसचं काम संपवून घरी येत होतो. घराजवळचा तो कॉर्नर मोगरा-सायलीच्या सुगंधाने दरवळला होता. अनंत ट्रॅफिकच्या जंजाळातून वाट काढत आमची बस माझ्या स्टॉपवर आली आणि थकलेल्या इंद्रियांसंगे मी उतरलो. आयुष्यातकाही गोष्टी कुठल्याही प्रसंगात ताजेतवाने करणाऱ्या असतात. ताजी फुले त्यात अग्रगण्य असावीत. त्या कॉर्नरजवळ आलो आणि पावले मंदावली. अत्यंत कुरूप असं वर्णन झटक्यात करता येईल अशी एक बाई तिथे मोगऱ्याचे गजरे करण्यात मग्न होती. ओठांवर कळ्यांइतक्याच नाजूक आवाजातलं एक गाणं असावं. शेजारीच एक मूल हातातल्या मळकट खेळण्याबरोबर चिमुकल्या हातांनी झटापट करण्यात रमलं होतं. त्या क्षणी ते द्रुष्य मोहकही होतं आणि जरासं विचित्रही.

जरा थांबून मी त्या फुलांकडे पाहत होतो तोच सायकलवरून एक "बाप्या" असं वर्णन करता येईल असा "इसम" आला. तिच्या ओठांवरचं गाणं अचानक थांबलं, मूलही स्तब्ध झालं. मी अजूनही तिथून काही ऐकू येण्याच्या अंतरावर नव्हतो.फुलांचा दरवळ मात्र होता. त्या इसमाच्या एकंदरीत वागणूकीवरून तो काही एक चांगला पती वाटत नव्हता. त्याने तिच्याकडे पैसे मागितले असावेत. तिने जरा टाळंटाळ करायचा प्रयत्न केला, तो ऐकेना तेव्हा दोन-चार नोटा त्याच्या हातात कोंबल्या. अपेक्षेप्रमाणेच तो नाराजच वाटला. अजून काही अबोध शब्द उच्चारून मूठभर फुले काहीही कारण नसताना आपल्या मूठीने चुरगाळून तो आला तसाच निघून गेला. संध्याकाळची वेळ आणि चेहऱ्यावरचे भाव पाहून तो कुठल्या दिशेला गेला असावा याचा मला अंदाज आला.

माझं लक्ष आता त्या फुलवालीकडं परतलं. थोड्याशा नाराजीनंतर तिचे ते सरावलेले हात पुन्हा फुलांकडे वळले होते. वाऱ्याच्या झुळुकेबरोबर आता सुगंध माझ्याकडे परतत होता. माझी पावले तिच्या टोपलीवजा दुकानाकडे वळली. वास्तविक गजरा घेण्याचं मला काहीच कारण नव्हतं. पण फुलं माझा उत्साह परत आणण्यात नेहमीच यशस्वी ठरतआलेली आहेत. आणि माझ्या त्या लहानश्या घरात फुलांनी आणलेला उत्साह मला हवाहवासा वाटत होता. पण तरीही फक्त फुलं कशी दिलीस, आणि मग पाच रुपयांची दे, आणि हा मी चाललो, असं करावसं मला काही वाटत नव्हतं. वास्तविक जगात अशा कितीतरी स्त्रिया असतील ज्याना नवऱ्याच्या व्यसनापायी त्रास सहन करावा लागतोय. आणि मी काय अशा सगळ्यांविषयी सहानुभूती दाखवत बसणाऱ्यांत नव्हतो. तरीही, त्या दिवशी मला तिच्याशी बोलावसं वाटलं. तिच्या टोपलीतल्या फुलांच्या रंगाचा तिच्या आयुष्यातल्या अंधाराशी काही एक संबंध नव्हता. पण तिला कदाचित त्याचं काही वाटतही नसावं. गजरे करताना तिच्य चेहऱ्यावरचा तजेला त्या अंधाराला पळवून लावायला पुरेसा होता. इच्छा असुनही त्या दिवशी मी तिच्याशी काही तसा संवाद साधू शकलो नाही.

त्या दिवसानंतर ती मला रोजच दिसयला लागली. म्हणजे तशी ती वर्षानुवर्षे तिथेच आपले दुकान मांडायची;माझ्या ध्यानात ते आता नोंदलं गेलं. फुलांचा सुगंध मला तिच्या टोपलीकडे खेचून न्यायचा. तिच्या नवऱ्याला मी बऱ्याच वेळा पाहिलं, अगदी त्याच अवस्थेत. हे सारं मला एक कोडंच होतं.
तो रस्ता, ती संध्याकाळ, तो धुंद सुगंध. एके दिवशी असाच त्या रस्त्याने येत असताना मला ती कथा सुचली. त्या फुलवालीच्या आयुष्याभोवती मी माझ्या कल्पना गुंफत गेलो. कल्पनेला शब्दांची साथ मिळत गेली. कथेची कल्पना जरी त्या फुलवालीपासून सुरू झालेली असली तरी तसा त्या कथेचा तिच्या खऱ्या आयुष्याशी फारसा काहीच संबंध नव्हता. परंतु ती कथा चांगलीच जमून गेली. एका मासिकाच्या दिवाळी अंक कथा स्पर्धेत मग मी ती पाठवली. लिखाणातून मिळणाऱ्या आनंदापुरताच मी लिखाणाचा उद्देश्य मर्यादित ठेवायचो. यावेळी मात्र मला कोण जाणे पण ती कथा स्पर्धेत पाठवाविशी वाटली.

दिवाळीच्या तीन आठवडे आगोदर निकाल जाहीर झाला. माझ्यासारख्या हौशी लेखकाने यावेळी पहिले पारितोषिक पटकावले होते. परिक्षकांनी माझ्या मते त्या कथेची जरा जास्तच प्रशंसा केली होती. मला साहजिकच अत्यानंद झाला. स्वतःवर जाम खूष झालो. एका स्वतःपुरते-स्वतःसाठीच लिहिणाऱ्याच्या कथेला आज व्यावसायिक स्पर्धेत यश मिळाले होते. साधारण त्याच काळात त्या फुलवालीचं दुकान अचानक बंद झालं. तो कोपरा सुनासुना वाटायचा. पण लवकरच मला त्या सगळ्याचा विसर पडला. माझ्या लिखाणात मी गुंग होतो. आता मी प्रथितयश तरूण लेखक बनलो होतो. आणि हळुहळू व्यावसायिकही. त्यानंतर माझे अनेक लेख प्रसिद्ध झाले. बक्षिसंही बरीच मिळाली. खूष होतो मी.

त्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनंतर ती मला परत दिसली. त्याच कोपऱ्यावर तिनं तिचं टोपलीवजा दुकान थाटलं होतं. फुलं तिच होती. ताजी-टवटवीत. मी आता बदललेलो होतो. संध्याकाळी येणारा फुलांचा सुगंध मला त्यांच्याकडे बोलवायचा. मी मात्र जरा दुरूनच तिथून वाट काढीत निघून जायचो. तिचा नवरा मात्र मला काही कधी दिसला नाही.

एकदा जुनी पुस्तके आवरताना कपाटात तळाशी तो दिवाळी अंक सापडला. आणि अचानक मला त्या फुलवालीची परत आठवण झाली. माझ्या पहिल्या कथेची ती नायिका होती. आणि मला तिचा विसर पडला होता? त्याच संध्याकाळी तिच्याशी बोलायचं मी ठरवलं. ते सुरुवातीचे दिवस डोळ्यासमोरून तरळून गेले.

तिनं मला ओळखलं. असंच बोलताना मी तिला माझ्या त्या कथेविषयी सांगितलं. आणि तिच्या आग्रहाखातर मी तिला सगळी कथा सांगितली. ती विशेष कौतुकाने ते सगळं ऐकत होती. कथा संपत आली होती. पाहतो तर तिच्या डोळ्यात अश्रू. कथा तशी भावनाप्रधानच 'केलेली' होती. मला कळेना की एवढं काय झालं.

"त्यानंतर काय होतं ते सांगू?" असं तिनं विचारताच मी चमकलो. तिनं त्यानंतर जे सांगितलं तसंच कथेत होतं. त्या लिहिता-वाचता न येणाऱ्या बाईला साहित्याची बरीच जाण होती म्हणायची.

"तुम्हाला कसं कळलं?" मी विचारताच ती उत्तरली, "ही तुम्ही फक्त लिहिली आहे कथा, मी ही कथा जगले आहे. असो. आज माझ्याकडून तुम्हाला ही स्पेशल फुलं! फार छान सांगता तुम्ही कथा."

तिनं दिलेली फुलं घेऊन मी परतलो. मला माझ्या बक्षिसाची लाज वाटली. कल्पनाशक्तिच्या जोरावर अशा भराऱ्या मी मारल्या होत्या. लेखक या नात्याने मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर केला होता. यश मिळाल्यावर तर याचं प्रमाण फारच वाढलं होतं. ते चांगलं की वाईट हे मला ठाऊक नाही, पण ते आंधळं होतं. मी माझ्याच स्वप्नील जगात जगत होतो. त्या फुलवालीनं मला जागं केलं होतं.

ती रात्र अशीच विचारमग्न अवस्थेत गेली. सकाळ झाली तेव्हा सगळं मळभ दूर झालेलं होतं. मी परतलो होतो. तोच मी होऊन जो कधी काळी संवेदनाशील होता. जो भौतिक जगाचा तितकाच भाग होता जितका काल्पनिक जगाचा. दोन जगांमधला तुटलेला सांधा जुळला होता.

तिनं काल दिलेली फुलं अजूनही तितकीच टवटवीत होती.

No comments: