Tuesday, May 03, 2005

३ मे १९०५

आता याच जगाचं उदाहरण घ्या!

या जगात घटना आणि त्याची कारणं यांची कधीकधी अदलाबदल होतेय असं जाणवेल - आणि कदाचित तसं जाणवणार होतंच याचा उलगडा जाणीव झाल्यावर होईल!

या जगात भूत आणि भविष्यकाळ एकमेकांवर अवलंबून आहेत.

(१)

रम्य नदिकिनारी, एका टुमदार बंगलीच्या गच्चीत एक व्यक्ती कठड्याला रेलून उभी आहे. नदिच्या प्रवाहाकडे खिन्नपणे पाहते आहे. कालप्रवाह या नदिच्या संथ पण एकाच दिशेने वाहणाऱ्या प्रवाहासारखा असता तर? यात कारण-परीणामांचे या जगातल्यासारखे भोवरे सापडले नसते. काहिही कारण नसताना जगाने त्या व्यक्तीकडे आज पाठ फिरवलेली आहे. त्याला आता कोणीही विचारत नाही - भेटायला येत नाही. इतकी सगळी वर्षे सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी ही व्यक्ती - अहो जगन्मित्रच! काय झालं असावं? (किंवा काय होणार असावं?)

या क्षणापासून फक्त सात दिवसांत त्या व्यक्तीची वागणूक पार बदलून जाते - वेडसर झाक येते त्याच्या बोलण्यात - चीडचीड, राग - अजागळ कपडे - कोणीही मग त्याच्या वाटेला जात नाही.

यात भविष्य कुठलं आणि भूतकाळ कुठला?
कारण काय आणि परीणाम?

(२)
या दुसऱ्या एका गावात शस्त्रास्त्रांवर आता बंदी घालण्यात आली आहे- नुकतीच. विळे कोयतेसुद्धा परवानगीशिवाय विकता/विकत घेता येत नाहित. गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांची ठिकठिकाणी झडती घेतली जाते आहे. पोलीसभरती दुपटीने वाढवण्यात आली आहे. काहितरी घडणार याची ही नांदी असावी का?

महिन्याभरातच त्या गावात अराजक माजतं. गुंडागर्दीला सुमार उरत नाही. जाळपोळ, लुटालूट - पार हद्द होते. जडजवाहिर- बाजारपेठा- सगळीकडे फक्त विनाश.

महिन्याभरापूर्वीचे 'नवे' शस्त्रास्त्रविरोधी कायदे-नियम हा या गुन्हेगारीवरचा उपाय होता? की त्याचं कारण?

(३)
एका विस्तीर्ण उद्यानात एक तरुणी हिरवळीवर बसली आहे. तशी ती दर रविवारी या उद्यानात येते; पण आजचा रविवार वेगळा आहे. गर्द लाल गुलाब, सुगंधी निशिगंध, धुंद कुंद - सगळं काही ती अचानक विसरते. क्षणात लाजेनं चूर चूर होऊन जाते. अत्यानंदानं स्वत:भोवती गिरकी घेते - अचानक!

थोड्याच दिवसांनंतर तिला तो राजबिंडा तरूण भेटतो.

या दोन घटना एकमेकांवर अवलंबून आहेत का?

(४)
या जगात वैद्नानिक अगदी बिचारे आहेत. त्यांची भाकितं ही फक्त दुजोरा ठरतात, जे सापडणार आहे याची. जुगारी माणसांसारखी ही शास्त्रद्न्य जमातदेखील हा शोधांचा जुगार अव्याहतपणे खेळत असते. या विचित्र जगात विद्न्यानाच्या मार्गाने सरळ जाणारा शास्त्रद्न्य वेडा ठरतो . ( की या सरळ जगात शास्त्रद्न्यच वाकड्या वाटेने जात असतो?) या 'विना'कारण जगात काहिही सांगता येत नाही!

(५)
या जगात कलाकार खरे राजे आहेत त्यांच्या जीवनाचे. त्यांच्या चित्रांतून, संगीतातून, लेखनातून सदैव कल्पनातीत गोष्टी पुढे येत असतात - आणि या जगात कल्पनातीत हेच वास्तव असल्यामुळे त्या या जगाशी एकरुप होऊन जातात.

--
या जगातले लोक एक गोष्ट शिकले आहेत- ती म्हणजे हा-आत्ताचा क्षण पुरेपूर जगायचा. जर भूतकाळाचा भविष्यावर जर काही परीणाम होणार असेल, आणि जर ते निश्चितच नसेल, तर भूतकाळात जगून काय फायदा? आणि जर वर्तमानाचं भविष्यावर फारसं नियंत्रण नसेल, तर भविष्यासाठी कशाला जगायचं? या जगात प्रत्येक क्षण हे एक बेट आहे. त्या बेटापुरतंच त्याचं महत्त्व आणि अस्तित्वसुद्धा.

या जगात उच्चारलेला प्रत्येक शब्द त्या क्षणापुरता आहे. प्रत्येक श्वास, फक्त त्या श्वासापुरता. प्रत्येक कटाक्ष त्या नजरेतल्या भावनांपुरता, त्याला न भूतकाळ आहे किंवा भविष्यकाळ.

प्रत्येक सूर फक्त त्या सूरापुरता...

प्रत्येक स्पर्श फक्त त्या स्पर्शापुरता...

प्रत्येक क्षण फक्त त्या क्षणापुरता...

---
उपसंहार :
Allan Lightman च्या Einstein's Dreams मधल्या ३ मे १९०५ च्या स्वप्नाचा हा अनुवाद आहे. अनेक दिवसांपासून मी एखाद्या स्वप्नाचे भाषांतर करावं असा विचार करत होतो. आज सकाळी सहज पुस्तक चाळता-चाळता या "स्वप्नावर नजर" पडली. आणि लिहून टाकलं. त्यानंतर शीर्षक देण्यासाठी पुन्हा पहिले पान पाहिले तर "३ मे १९०५". काही गोष्टींचे स्पष्टिकरण देता येत नाही. आजची तारीख आहे ३ मे २००५! आणि योगायोग पहा - कारण आणि परीणाम यांची गफलत झालेल्या काळाचं हे स्वप्न आहे.

प्रत्येक गोष्टीला कारण नसतं हेच खरं!

No comments: